चाळिशीनंतरच्या आरोग्यदायी संकल्पनेतील नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
वयाच्या चाळिशीनंतर आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असताना क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून मास्टर प्रदीप पाटील यांनी नवी मुंबईत रूजवलेले फोर्टी प्लस क्रिकेटचे बीज आता संपूर्ण राज्यात लोकप्रिय होत असून या माध्यमातून नवी मुंबईच्या नावलौकीकीत भर पडली असल्याचा आनंद व्यक्त करीत आमदार श्री. गणेश नाईक यांनी यामधून क्रीडा संस्कृती विकसित होण्यासोबतच आरोग्य संवर्धनाचा संदेशही प्रसारित होत असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15, घणसोली येथील फोर्टी प्लस मैदानात 21 ते 23 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस स्पर्धा' शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांच्या समवेत महापौर श्री. जयवंत सुतार, उपमहा++
पौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. उषा भोईर, नगरसेवक श्री. लिलाधर नाईक व श्रीम, अनिता मानवतकर, नवी मुंबई फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, सचिव श्री. लिलाधर पाटील, खजिनदार श्री. नरेश गौरी, कार्यकारणी सदस्य श्री. विकास मोकल, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापौर श्री. जयवंत सुतार यांनी या स्पर्धेत ग्रामीण आणि शहरी भागातील 50 संघ सहभागी होत असल्याबद्दल खेळाडूंचे कौतुक करीत फोर्टी प्लस संकल्पनेमुळे आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असल्याचे सांगितले. पुढील वर्षीच्या स्पर्धा प्रकाशझोतात खेळविण्याचा मनोदय व्यक्त करतानाच या स्पर्धेत विजेता, उपविजेता होण्यापेक्षा मी स्पर्धेत सहभागी होऊन खेळलो ही खेळाडूंच्या मनातील एकात्मतेची भावनाच मोठी असल्याचा महापौरांनी विशेष उल्लेख केला.
क्रीडा समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी फोर्टी प्लस क्रिकेट ही संकल्पनाच अत्यंत आगळीवेगळी असल्याने आरोग्याविषयी जागरूक असणा-या सर्वांना ती लगेच भावते आणि त्यामुळेच ती अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याची भावना व्यक्त केली.
3 दिवस चालणा-या या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेमध्ये नवी मुंबईच्या ग्रामीण भागातील 32 व शहरी भागातील 18 संघ सहभागी झाले असून रविवार दि. 23 फेब्रुवारी 2020 रोजी सायं. 5.30 वा. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तरी क्रिकेटप्रेमी रसिकांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिवसभर चालणारे सामने पाहण्याकरिता उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-02-2020 08:21:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update