कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेशी प्रवास करून आलेल्या प्रवाशांची अलगीकरणातून घेतली जाते काळजी
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये याकरिता आवश्यक ती सर्व खबरदारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात 38 बेड्स व आवश्यक व्हेंटिलेटर्सची सुविधा असणारा विलगीकरण (ISOLATION) कक्ष स्थापित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परदेशातून भारतात आलेल्या नवी मुंबईतील प्रवाशांना 14 दिवस अलगीकरण (QUARANTINE) कक्षात ठेवण्याची सुविधा वाशी सेक्टर 14 येथील बहुउद्देशीय इमारतीत करण्यात आलेली आहे.
परदेशातून आलेल्या प्रवाशांव्दारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्व टुर्स आणि ट्रॅव्हल्स एजंट यांच्याकडून परदेशी प्रवास करून आलेल्या व येत असलेल्या नवी मुंबईतील प्रवाशांची माहिती संकलीत केली असून यापुढील काळात कोणतीही व्यक्ती परदेश प्रवास करणार नाही याविषयी काटेकोर निर्देश दिलेले आहेत.
या टुर्स व ट्रॅव्हल्स एजन्ट्सकडून तसेच महाराष्ट्र शासनाचा विमानतळावरील कक्ष आणि सोसायटीचे पदाधिकारी व जागरूक नागरिक यांच्याकडून प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने स्थापन केलेले विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद पथक परदेशी प्रवास करून आलेल्या संबंधितांकडे त्वरीत पोहचत असून ती प्रवासी व्यक्ती नवी मुंबईत कधी परत आली, त्यांना सर्दी, खोकला किंवा ताप अथवा तत्सम लक्षण आहे काय अशी पाहणी करीत आहेत तसेच त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेत आहे.
अशा परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्तींची सध्या प्रकृती सर्वसाधारण असली तरी या प्रवाशांना 14 दिवस अलगीकरण (QUARANTINE) करून राहणे गरजेचे असल्याचे पटवून दिले जात आहे व त्यांना घरातच अलगीकरण करून राहण्यास (HOME QUARANTINE) सांगितले जात आहे. असे अलगीकरण केले जात असताना त्यांच्या संपर्कात घरातील एकाच व्यक्तीने किमान 1 मीटर असे पुरेसे अंतर ठेवून त्यांची व स्वत:ची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. अशा प्रवाशांशी नवी मुंबई महानगरपालिकेचे त्या विभागातील आरोग्य अधिकारी दररोज दिवसातून किमान 3 वेळा संपर्क साधत असून शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत त्यांचे निरीक्षण केले जात आहे व त्यांची आवश्यक काळजी घेतली जात आहे.
परदेश प्रवास करून आलेले जे प्रवासी अशाप्रकारे घरातच 14 दिवस अलगीकरण करून राहण्यास तयार होत नाहीत त्यांना पोलीसांच्या मदतीने त्यांच्या घरातच अलगीकरण कार्यवाही करून घेण्यात येत आहे अथवा नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या अलगीकरण कक्षात त्यांना दाखल करून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परदेशी प्रवास करून आलेल्या ज्या प्रवाशांची घरे लहान आहेत व घरात अलगीकरण करणे शक्य नाही, किंवा ज्यांच्या घरी काळजी घेणारे कोणी नाही, अशा प्रवाशांनाही अलगीकरण कक्षात दाखल करून घेण्यात येत आहे.
तथापि परदेशी प्रवास करून आलेले काही नागरिक आपल्या घरात 14 दिवस अलगीकरण करून राहण्यास तयार आहेत मात्र त्यांना तसे राहू देण्यास त्यांचे शेजारी, आजुबाजूचे नागरिक तयार नाहीत, अशाही तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यादृष्टीने सुजाण नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ते प्रवासी कोरोना बाधित सिध्द झाले नसून व तशा प्रकारची आजाराची लक्षणे त्यांच्यात दिसत नसूनही वैयक्तीक व सामाजिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वत:हून अलगीकरणासाठी तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याशी जवळचा संपर्क येऊ न देता त्यांना एकांतात राहू देऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे. नागरिकांनी अशा शेजारी राहणा-या विलगीकरण केलेल्या प्रवाशांना सहकार्य करावे व स्वत:चीही काळजी घ्यावी.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील अलगीकरण कक्षात 16 परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिकांना दाखल करण्यात आले असून त्याठिकाणी त्यांची जेवणासह सर्व व्यवस्था करण्यात आली आहे व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार हा संसर्गातून होत असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे घाबरून न जाता स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी. खोकताना, शिकताना हातरूमालाचा वापर करावा. आपले हात साबण व पाण्याने वारंवार स्वच्छ धुवावेत तसेच श्वसनसंस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना अधिक काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 19-03-2020 11:08:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update