'होम क्वारंटाईन' चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सजगतेने अहोरात्र काम करीत असून यामध्ये विशेषत्वाने परदेशातून आलेल्या प्रवाशांव्दारे मोठ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात घेऊन आजाराची लक्षणे दिसत असोत वा नसोत परदेशी प्रवास करून आलेल्या प्रत्येक प्रवाशाने 14 दिवस अलगीकरण करून राहण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे.
यामध्ये त्यांना त्यांच्या राहत्या घरी निवासस्थानी अलगीकरण करून राहण्याची सोय (HOME QUARANTINE) उपलब्ध असून त्यांच्या घरी लक्ष देणारे कुणी नसल्यास अथवा घर लहान असल्याची अडचण असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर 14 वाशी येथे तयार केलेल्या अलगीकरण कक्षात त्यांची वैद्यकीय सुविधेसह भोजन व सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना दिल्या आहेत त्यांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने घरातच राहणे आवश्यक आहे. तथापि काही प्रवासी नागरिक होम क्वारंटाईन असून इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्य हिताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून अशाप्रकारे होम क्वारंटाईन व्यक्तीने स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनामार्फत देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रभावी उपाययोजना करीत आहे.. त्यामुळे ज्यांनी परदेश प्रवास केलेला आहे अथवा कोरोना बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या ज्या निकटच्या व्यक्ती आहेत त्यांना होम क्वारंटाईनच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्याशी महानगरपालिकेच्या स्थानिक नागरी आरोग्य केंद्रातील शीघ्र प्रतिसाद पथकाकडून नियमित संपर्क ठेवला जात आहे.
तथापि अशा होम क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्ती घराबाहेर पडून फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून अशा व्यक्तींविरूध्द महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांना "साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897" अंतर्गात नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपाययोजना करण्याकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून प्राप्त अधिकाराच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व होम क्वारंटाईन व्यक्तींनी व त्यांच्या कुटूबियांनी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावयाची आहे.
परदेशी प्रवास करून नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेकडे देण्यासाठी स्वत: प्रवाशाने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा टोल फ्री क्रमांक 1800222309 / 2310 यावर संपर्क साधावा असे आवाहन आहे.
Published on : 23-03-2020 07:33:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update