कोरोना नियंत्रक कोअर कमिटीच्या बैठकीत नवी मुंबई महापौर, आयुक्तांचे दूरगामी नियोजनाचे आदेश
कोव्हीड - 19 चा वाढता प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली असून 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तत्परतेने कार्यवाही करण्यात येत आहे. संसर्गातून हा रोग पसरू नये याकरिता नागरिकांनी अतिशय अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडूच नये अशाप्रकारचे आवाहन सातत्याने करण्यात येत असून पोलीस विभागामार्फतही नागरिकांची गर्दी होऊ नये याकरिता आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर नियंत्रण राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अधिक तीव्रतेने करण्याची गरज लक्षात घेऊन आज नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत कोव्हीड -19 नियंत्रण कोअर कमिटीची तातडीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये कोव्हीड - 19 चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता अधिक प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सखोल विचार विनिमय करण्यात आला. त्याचप्रमाणे हा प्रादुर्भाव वाढलाच तर परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने दूरगामी विचार करण्यात आला. यादृष्टीने महानगरपालिकेच्या विविध विभागप्रमुखांकडे कामांच्या जबाबदा-या निश्चित करण्यात आल्या व तशाप्रकारचे आदेश काढण्याचे निर्देशित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने होर्डीग, पोस्टर्स, हस्तपत्रके, गॅन्ट्री, सोशल मिडीयाव्दारे प्रभावी जनजागृतीप्रमाणेच कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये याकरिता विशेष दक्षता घेतली जात असून परदेशातून भारतात आलेल्या नवी मुंबईतील प्रवाशांना 14 दिवस अलगीकरण (QUARANTINE) कक्षात ठेवण्याची सुविधा वाशी सेक्टर 14 येथील बहुउद्देशीय इमारतीत करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत या अलगीकरण कक्षात 58 परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिकांना दाखल करण्यात आले आहे व त्यांची जेवणासह सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांना डॉक्टर्ससह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 227 नागरिक त्यांच्या निवासस्थानी अलगीकरण (HOME QUARANTINE) करून रहात आहेत. त्यांच्याशी स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत शीघ्र प्रतिसाद पथकाकडून नियमित संपर्क साधला जात आहे.
तथापी काही सोसायटी / वसाहतींमध्ये स्वत:च्या घरी अलगीकरण (HOME QUARANTINE) करून राहत असलेल्या परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांना तसे राहू देण्यास त्यांचे शेजारी, आजुबाजूचे नागरिक तयार नाहीत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यादृष्टीने सुजाण नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ते प्रवासी कोरोना बाधित सिध्द झालेले नसून व तशा प्रकारची आजाराची लक्षणेही त्यांच्यात दिसत नसून ते वैयक्तीक व सामाजिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वत:हून घरी अलगीकरणासाठी तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याशी जवळचा संपर्क येऊ न देता त्यांना एकांतात राहू द्यावे व आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे. नागरिकांनी अशा शेजारी राहणा-या विलगीकरण केलेल्या प्रवाशांना सहकार्य करावे व स्वत:चीही काळजी घ्यावी असे आवाहन आहे.
त्याचप्रमाणे अशा घरी अलगीकरण (HOME QUARANTINE) करून राहत असलेल्या प्रवाशांनी आपल्या अलगीकरण कालावधीत अजिबात घराबाहेर पडू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावयाची आहे. अशा प्रकारे घरी अलगीकरण करून रहात असूनही घराबाहेर पडलेल्या एका प्रवासी व्यक्तीचा एफ.आय.आर. पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे.
अशाप्रकारे परदेशी प्रवास करून नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांची माहिती स्वत: प्रवाशांनी, त्यांच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे देण्यासाठी तसेच कोरोना विषयक अधिकची माहिती देण्या-घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800222309 / 2310 याचा वापर करावा असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात आहे.
Published on : 23-03-2020 15:51:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update