नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आल्याने भाजीमंडईमध्ये गर्दी न करण्याचे महानगरपालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांचे आवाहन
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याकाळात जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन संपूर्णपणे खबरदारी घेत आहे. कोरोना हा संसर्गातून पसरणारा आजार असल्याने भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करूनa देण्यात येणार असल्याने नागरिकांनी भाजी मंडईमध्ये गर्दी करू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरीदेखील नागरिक बाजारामध्ये तसेच भाजी मंडईत गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी भाजीपाला, फळे नागरिकांना घराजवळ मिळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने किरकोळ हातगाडी विक्रेता / टेम्पोधारक यांचेमार्फत चौका-चौकामध्ये तसेच गृहनिर्माण संस्थांच्या परीसरात भाजीपाला व फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
याकरीता आठही विभाग अधिकाऱी यांचेमार्फत विभागनिहाय भाजीपाला व फळे विक्रेता टेम्पो धारकाची नावे, टेम्पो क्रमांक व मोबाईल क्रमांक नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळ www.nmmc.gov.in (वेबसाईट) प्रसिध्द करण्यात येत आहे. नागरिकांनी व संस्थेच्या पदाधिकारांनी या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपल्या परिसरात भाजीपाला व फळे विक्रीकरीता दिनांक व वेळ निश्चित करून घ्यावी. तसेच किरकोळ विक्रेत्यांनी देखील मंडईमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये, याबाबत संबधितांना सूचना देण्याविषयी निर्देश दिलेले आहेत.
या भाजी विक्रेत्यांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असून मास्क, हातमोजे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. नागरिकांनी भाजीपाल्याचा पुरवठा सुरू आहे याची कृपया नोंद घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गर्दी करु नये असेही आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे .
या काळात किराणा मालाची दुकानेही नियमितपणे सुरु राहणार आहेत. बाजारपेठेत मुबलक साठा शिल्लक आहे. नागरिकांनी उगाचच घाबरून जाऊन साठा करून ठेवू नये. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी किरकोळ दुकानदार, व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे तसेच नागरिकांनी थेट दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा आवश्यक सामानाची यादी तयार करून पाठवावी व दुकानदाराने दिलेल्या वेळी जाऊन सामानाची उचल करावी असे सूचित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी जितक्या प्रमाणात गर्दी टाळणे शक्य आहे तेवढी गर्दी टाळावी व अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी घराबाहेर आल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये 3 फुटाइतके सुरक्षित अंतर राखावे व नागरिकांच्याच आरोग्य हितासाठी नियम पाळून सहकार्य करावे असे न्रम आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-03-2020 12:24:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update