उद्योगांच्या ठिकाणी कोरोना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांचे निर्देश
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897" ची अंमलबजावणी 13 मार्चपासून सुरु झाली असून त्यामधील खंड 10 नुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी कोव्हीड - 19 चा प्रतिबंध व नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ हे सक्षम प्राधिकारी आहेत.
कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना फार्मासिटीकल, बॅकींग आय.टी. सेक्टर, डाटा सेंटर अशा अत्यावश्यक सेवा पुरविणारे उद्योग व आस्थापना यांना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने काही महत्वाच्या गोष्टींची खबरदारी घेत, त्यांच्या एकूण क्षमतेच्या 10 टक्के कर्मचारी कामावर घेऊन काम सुरू ठेवण्यास शासन निर्णयानुसार परवानगी देण्यात येत आहे. तथापि सदर परवानगी खालील अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अधीन राहून देण्यात येत असल्याचे आयुक्तांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.
(1) उद्योग / आस्थापना यामध्ये अत्यावश्यक सेवांसाठी कार्यरत कर्मचारी यांनी प्रत्यक्ष कामकाजाच्या ठिकाणी तसेच उद्योग / आस्थापनांचा परिसर, कॅंटीन, कॅफेटेरिया परिसरात एकमेकांपासून किमान 3 मीटरचे अंतर राखून सोशल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहील.
(2) सुरक्षा रक्षकांसह उद्योग / आस्थापना यामध्ये कार्यरत कर्मचारी यांची लॉजींग / बोर्डींग व्यवस्था कंपनी आवारातच करणे आवश्यक राहील.
(3) उद्योग / आस्थापना यांच्या संपूर्ण परिसराचे दिवसातून 3 वेळा निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक राहील. यामध्ये विश्षत्वाने दरवाज्यांचे हॅंडल्स, नळाचे टॅप, संगणक, की बोर्ड, माऊस, फ्लश टँकचे नॉब अशा जिथे अनेक व्यक्तींचा वारंवार स्पर्श होतो अशा विविध गोष्टींचेही निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
(4) उद्योग / आस्थापना यांनी आपल्या कार्यरत कर्मचा-यांसाठी तीन पदरी मास्क, हँड ग्लोव्हज, हँड सॅनिटायझरची व्यवस्था करणे व ते वापरात आणण्यावर लक्ष ठेवणे.
(5) अत्यावश्यक सेवेकरिता उद्योग / आस्थापना यामध्ये कामावर रूजू झालेला कर्मचारी यास लॉकडाऊनच्या काळात कामाचे ठिकाण सोडण्याची परवानगी नाही. अत्यावश्यक प्रसंगी कर्मचारी बदली करण्याची वेळ आली तर बदलीने रूजू होणा-या कर्मचा-याची कोव्हीड - 19 टेस्ट निगेटिव्ह असणे व त्यानंतर तो कर्मचारी 14 दिवस क्वारंटाईन राहून नंतर केलेली कोव्हीड - 19 टेस्टही निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. त्यानंतरच सदर बदली कर्मचारी यांस कामावर रूजू करून घेता येईल.
(6) कर्मचारी यांची निवास व्यवस्था करताना दोन व्यक्तींच्या बेडमध्ये किमान 2 मीटर अंतर राहील याची दक्षता घेणे. प्रत्येक कर्मचारी यांचेसाठी स्वतंत्र बाथरूम व टॉयलेट व्यवस्था असणे. स्वतंत्र व्यवस्था शक्य नसल्यास प्रत्येक वापरानंतर टॉयलेट व बाथरूम व्यवस्थित स्वच्छ करणे.
(7) सर्व कर्मचारी यांच्या पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करणे व प्रत्येक कर्मचारी गरम पाणी पित असल्याकडे लक्ष ठेवणे.
(8) एखाद्या कर्मचारी यांस ताप, घशात खवखव, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित उद्योग / आस्थापना यांच्या क्षेत्रानजिकच्या महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्रास कळविणे.
(9) उद्योग / आस्थापना यांना आवश्यक असणारा कच्चा माल पुरवठा करणा-या वाहनांना परिसरात ठराविक अंतरापर्यंतच प्रवेश द्यावा. त्यापुढे प्रवेश देणे अगदी आवश्यक असल्यास निर्जंतुकीकरण करूनच वाहनास प्रवेश देणे.
(10) उद्योग / आस्थापना यांच्या आतील भागातच शिजविलेले खाद्यपदार्थ कर्मचारी यांना देणे व बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास प्रतिबंध करणे.
(11) उद्योग / आस्थापना यामधील प्रवेश प्रतिबंधित करणे.
या अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याच्या जबाबदारीवरच अत्यावश्यक सेवेतील उद्योग / आस्थापना यांना त्यांच्या मूळ कर्मचारी क्षमतेच्या 10 टक्के कर्मचा-यांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देत असल्याचे नमूद करीत यांचे उल्लंघन करणा-यांविरोधात भारतीय दंड संहिता (45 चे 1860) कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
Published on : 27-04-2020 07:17:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update