महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' चा प्रारंभ 'निश्चय केला - नंबर पहिला' संकल्पपूर्तीसाठी एकदिलाने प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आवाहन
एखादे यश मिळविण्यासाठी परिश्रम आवश्यक असतातच, मात्र मिळालेला नंबर टिकविण्यासाठी व त्यात वाढ करण्यासाठी आत्यंतिक परिश्रमाची आवश्यकता असते. यासाठी सज्ज होऊन 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' ला सुरूवात होत असताना स्वच्छ शहरांमध्ये असलेला देशातील तिसरा क्रमांक यावर्षी "निश्चय केला - नंबर पहिला' हे लक्ष्य व 'क्लिनर टूडे - बेटर टुमारो' असे ध्येय नजरेसमोर ठेवून गाठायचे आहे अशा शब्दात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करीत सुरू झालेल्या स्वच्छताविषयक विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
नवी मुंबईने इतरांनी अनुकरण कराव्यात अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी राबविल्याने आपण नेहमीच अग्रेसर राहिलो आहोत याचे श्रेय प्रामुख्याने स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिक आणि शहर स्वच्छतेचे काम दररोज नियमितपणे करणारे सफाई कर्मचारी यांचे असल्याचे सांगत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्वच्छता कार्यात सक्रीय सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांचा विशेष उल्लेख केला.
नवी मुंबई शहर स्वच्छ असणे म्हणजे येथील नागरी भागाप्रमाणेच गावे, झोपडपट्टी, औद्योगिक क्षेत्र असा प्रत्येक भाग स्वच्छ असणे गरजेचे असल्याचे सांगत याकरिता स्वच्छता ही प्रत्येकाची नियमित सवय व्हायला हवी व यातून स्वच्छतेची चळवळ अधिक जोमाने उभी रहायला हवी अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.
शहराचा देशात पहिला नंबर येण्यासाठी एक म्हणजे कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी कच-याचे ओला, सुका आणि घरगुती घातक अशा 3 प्रकारे वर्गीकरण केले जाणे तसेच दुसरे म्हणजे ओल्या कच-यावर निर्माण होतो त्याच ठिकाणी नागरिकांकडून प्रक्रिया केली जाणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आज कोरोनासारख्या अत्यंत अवघड परिस्थितीला तोंड देत असताना स्वच्छतेसारख्या आरोग्याशी संबंधित असलेल्या गोष्टींबाबत जागरूक राहून, कोव्हीडविषयी संपूर्ण काळजी घेत स्वच्छतेमध्ये अधिक सुधारणा करण्याचे आव्हान आपण सर्वांच्या एकत्रित सहकार्याने स्विकारले पाहिजे असे आयुक्तांनी सूचित केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री.सुरेंद्र पाटील, उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, श्री. योगेश कडुस्कर, श्रीम. क्रांती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने 'सर्वात स्वच्छ, सर्वात स्वच्छ, नवी मुंबई सर्वात स्वच्छ - या करूया आपण मिळूनी या सुंदर स्वप्नाला सत्य' - अशा शब्दातली स्वच्छतेची सुरेल जिंगल प्रकाशित करण्यात आली. त्याचप्रमाणे 'गाठूया शिखर स्वच्छतेचे' हे पथनाट्य सप्तश्री कला व सामाजिक संस्था यांच्या कलावंतानी सादर करीत स्वच्छतेविषयी नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या कामांची मनोरंजक स्वरूपात माहिती देत प्रबोधन केले.
यावेळी नवी मुंबईतील विविध ठिकाणच्या नागरिकांची शहर स्वच्छतेविषयीचे अभिप्राय व अपेक्षा दर्शविणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आभार प्रदर्शन केले.
टाकाऊपासून टिकाऊ पुनर्वापराचा संदेश प्रसारित करणार महात्मा गांधीजींचा चष्मा व चरखा ही प्रतिकचिन्हे
घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई महानगरपालिकेने 'रिड्युस, रियूज आणि रिसायकल' या 'थ्री - आर' वर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये रियूज अर्थात कच-याचा पुनर्वापर उपक्रमाचा एक भाग म्हणून टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू अंतर्गत जुन्या टाकाऊ सायकलींच्या विविध भागांचा वापर करून बनविण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या चष्मा आणि चरखा या प्रतिकचिन्हांचे उद्घाटन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स प्रा.लि. यांच्या माध्यमातून बिनॉय के., जसपाल सिंग, देवेन्द्र सिंग व मच्छिंद्र पाटील आणि सहका-यांनी तयार केलेली ही प्रतिकचिन्हे महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर ठेवण्यात आली असून याव्दारे स्वच्छता आणि कच-याच्या पुनर्वापराचा संदेश नागरिकांच्या नजरेसमोर राहणार आहे.
Published on : 02-10-2020 12:40:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update