'माझी वसुंधरा' अभियानातून नवी मुंबईची पर्यावरणशील शहर म्हणून ओळख होण्याकरीता प्रयत्न
पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांशी निगडीत जीवनशैलीचा स्विकार करून शाश्वत व निसर्गपूरक जीवनपध्दती अंगिकारण्यासाठी 'माझी वसुंधरा' हे विशेष अभियान राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राज्य स्तरावर राबविण्यात येत आहे.
याव्दारे पर्यावरणाची जपणूक करून मानवी जीवन अधिकाधिक समृध्द करणे व जैवविविधतेला पूरक वातावरण निर्माण करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे. दि. 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या 667 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात नवी मुंबई महानगरपालिका सहभागी असून देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय व राज्यात सर्वप्रथम क्रमांकाचे मानांकीत शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहराकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभियानाच्या अनुषंगाने विशेष बैठक घेऊन अभियानाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांचा व राबविण्याच्याच्या उपक्रमांचा कालबध्द कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगेरे, डॉ.बाबासाहेब राजळे, श्री. मनोजकुमार महाले व इतर अधिकारी उपस्थित होते.
'माझी वसुंधरा अभियाना'मध्ये निसर्गातील पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश अशा पाचही तत्वांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामांचे मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये पृथ्वी तत्वाच्या अनुषंगाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन तसेच वायू तत्वाकरिता प्रदूषण कमी करून हवा गुणवत्तेत सुधारणा करणेविषयी केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. जल तत्वाकरिता जलस्त्रोतांचे संरक्षण, स्वच्छता व संवर्धन, सागरी जैव विविधता अशा गोष्टींचे आणि अग्नी तत्वाकरिता उर्जेचा योग्य वापर, उर्जा बचत, उर्जेचा अपव्यय टाळण्यास प्रोत्साहन देणे तसेच अपारंपारिक उर्जा निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे अशा बाबींचे मूल्यमापन केले जाणार आहे. पाचवे आकाश तत्व हे स्थळ व प्रकाश या स्वरूपात निश्चित करून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे जनजागृतीपर उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविणे याविषयी केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे.
या पाचही तत्वाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांविषयी तसेच राबवावयच्या उपक्रमांविषयी आयुक्तांनी संबंधित अधिकारी वर्गाशी मुद्देनिहाय सविस्तर चर्चा केली. तसेच निसर्गातील पाचही तत्वांपैकी प्रत्येक तत्वाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व लक्षात घेऊन आजच्या पर्यावरण स्थितीत लक्षणीय सुधारणा करण्याच्या दृष्टीने काम केले जावे असे स्पष्ट केले. अभियानामध्ये करावयाच्या अपेक्षित कामांचा कालबध्द कार्यक्रम आखणे व त्याची कृतीशील अंमलबजावणी विहित वेळेत करणे याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या हाता घेतलेल्या कामांचा व उपक्रमांचा बैठका घेऊन नियमित आढावा घेतला जाणार आहे.
कोणताही उपक्रम किंवा अभियान नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय यशस्वी होत नाही त्यामुळे व्यापक लोकसहभाग मिळण्याच्या दृष्टीने पंचतत्वांशी संबंधित विविध कार्यक्रमांची आखणी करावी असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्वच्छतेसह सर्वच क्षेत्रात नवी मुंबई नेहमीच आघाडीवर असणारे शहर असून सुविधांमध्ये अधिक दर्जेदारपणा व नाविन्यता आणत पर्यावरणाच्या बाबतीतही निसर्गाच्या साधनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करणारे एक स्वयंपूर्ण पर्यावरणशील शहर म्हणून नवी मुंबई ओळखली जावी यासाठी 'माझी वसुंधरा' अभियान व्यापक जनसहभागातून यशस्वी होईल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला व याकामी सर्व विभागांनी आपले सर्वोत्तम योगदान द्यावे असे निर्देश दिले.
Published on : 07-11-2020 14:52:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update