मालमत्ताकर विभागाची कार्यप्रणाली लोकाभिमुख करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या नागरी सेवासुविधा या विविध करांमधून प्राप्त होणा-या महसूलातूनच पुरविल्या जात असल्याने आणि मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसूलाचा मुख्य स्त्रोत असल्याने मालमत्ताकर वसूलीकडे विशेष लक्ष देण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मालमत्ताकर विभागाच्या विशेष बैठकी प्रसंगी दिले.
अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्यासह मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाच्या सद्यस्थितीची माहिती करून घेतली. यामध्ये प्रत्येक वर्षी देण्यात आलेले उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसूली याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
यावर्षी कोरोनामुळे मालमत्ताकर वसूलीवर परिणाम झालेला आहे. तथापि आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत असून यापुढील काळात मालमत्ताकर वसूली अधिक प्रभावीपणे करण्यावर भर द्यावा असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. याकरिता विभाग कार्यालयात नियुक्त संबंधित मालमत्ताकर अधिकारी, कर्मचारी यांना वसूलीचे उद्दिष्ट देण्यात यावे व त्याचा नियमित आढावा घेण्यात यावा असे आयुक्तांनी निर्देशित केले.
मालमत्ताकर भरणा करण्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत तसेच नागरिकांमार्फत दाखल केलेले अर्ज विहित वेळेत निकाली काढण्यात यावेत व नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवू नयेत असे सूचित करीत आयुक्तांनी नागरिकांना जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचे लक्षात आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याबाबत हयगय केली जाणार नाही असे स्पष्ट केले.
मालमत्ताकराची रक्कम भरण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात अथवा बिल भरणा केंद्रांवर येण्याची गरज भासू नये याकरिता ऑनलाईन प्रणाली नागरिकांना सहज वापरण्यायोग्य करावी व झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट राहील अशी कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.
सध्या ऑनलाईन रक्कम भरणा करण्याचे जास्त वापरात असलेले पर्याय नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, विद्यमान ऑनलाईन प्रणाली वापर करणा-या नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या दूर कराव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने रक्कम भरणा करण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवावी अशाही सूचना देण्यात आल्या.
मालमत्ताकर भरणे हे प्रत्येक मालमत्ताकर धारकाचे कर्तव्य असून त्याची जाणीव त्यांना करून द्यावी असे स्पष्ट करीत त्यासोबतच मालमत्ताकर धारकांच्या वेगवेगळ्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे व त्याबाबत त्यांना तत्परतेने मदत केली पाहिजे असे आयुक्तांनी सांगितले. मालमत्ताकर विभागाचे काम लोकाभिमुख असले पाहिजे अशी प्रतिमा आपल्या कामातून निर्माण करा अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने मालमत्ताकर 'अभय योजना' जाहीर केली आहे. 15 डिसेंबरपासून 15 फेब्रुवारीपर्यंत त्याची मुदत आहे. थकीत संपूर्ण मालमत्ताकर आणि त्यावरील 25 टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास थकबाकीदारांना दंडात्मक रक्कमेतून 75 टक्के इतकी मोठ्या प्रमाणावर सूट मिळणार असून त्याचे फायदे थकबाकीदारांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. याविषयीची जाहिरात मोठ्या प्रमाणावर करावी असेही निर्देश देण्यात आले. महत्वाचे म्हणजे कार्यालयात बसून लोकांनी मालमत्ताकर भरण्याची वाट न पाहता त्यांच्यापर्यंत पोहोचा असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले.
मालमत्ता कराच्या वसूलीप्रमाणेच नवीन मालमत्तांचे मूल्यांकन (Property Assesment) करणेही तितकेच महत्वाचे असून त्याकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश देण्यात आले. त्याबाबत जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.*
मालमत्ताकराची थकबाकी असणा-यांची यादी उतरत्या क्रमाने तयार करून तत्पर कार्यवाहीस सुरूवात करावी असे अधिकारी, कर्मचारी यांना निर्देशित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभय योजना फेब्रुवारीपर्यंतच आहे, त्याला मुदतवाढ दिली जाणार नाही हे नागरिकांना स्पष्ट करावे व योजनेचा फायदा घेण्याचे सांगावे तसेच या माध्यमातून जास्तीत जास्त मालमत्ताकर व थकबाकी वसूल करण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देशित करण्यात आले.
Published on : 15-12-2020 13:47:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update