दुस-या सहामाहीची मालमत्ताकर देयके भरण्यास 31 मार्च पर्यंतचा कालावधी
कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळामुळे सर्वच घटकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. याचा विचार करून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीत मालमत्ताकर थकबाकीदारांच्या दंडाच्या रक्कमेवर 75 टक्के सवलत देणारी अभय योजना जाहीर करून थकबाकीदारांना दिलासा दिला होता. याबाबत मुदत वाढ करावी अशा प्रकारच्या प्राप्त विविध विनंती व सूचनांच्या अनुषंगाने 1 मार्च 2021 पर्यंत अभय योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अभय योजनेचा कालावधी संपण्यास आता केवळ 4 दिवस उरले असून मालमत्ताकर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेच्या http:/www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन आपली रक्कम भरावी आणि अभय योजनेच्या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे सन 2020-21 मधील दुस-या सहामाहीची वितरित करण्यात आलेली मालमत्ताकर देयके भरणा करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 होती. तथापि यामध्येही नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता सदर कालावधीतील देयक रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी आपली या आर्थिक वर्षातील दुस-या सहामाहीची देयक रक्कम लवकरात लवकर भरणा करून शहर विकासास आपला हातभार लावावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-02-2021 07:38:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update