हिवताप, डेंग्यू रोखण्याकरिता नमुंमपा आरोग्य विभागाची विशेष मोहीम


नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना, येथील विस्तृतखाडीकिनारा, रहिवाशी भाग व स्थलांतरित लोकसंख्या यामुळे नमुंमपा कार्यक्षेत्र हे हिवताप, डेंग्यू या आजारांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. हे लक्षात घेत नमुंमपा आरोग्य विभागामार्फत संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्यक्ष सर्वेक्षण, नियोजित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण,घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोधमोहीम याव्दारे नियमित स्वरुपात हिवताप, डेंग्यू या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे.
सद्यस्थितीत पावसाळा कालावधी सुरु असून सातत्याने पाऊस न पडता त्याची ये-जा सुरु आहे. हे वातावरण हिवताप, डेंग्यू सारखे रोग पसरविणाऱ्या डासांसाठी अतिशय पोषक वातावरण आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डासांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रात वाढलेली डास उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभागाने धडक मोहीम राबविण्यास सुरूवात केलेली आहे.
हिवताप, डेग्यू यासारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरांतर्गत व घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील डासउत्पत्ती स्थानांमध्ये होत असते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गतवर्षीच्या तुलनेत हिवताप, डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ झालेली असल्याचे निदर्शनास येत असलेल्या संवेदनशील भागात तेथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून 15 ते 26 सप्टेंबर या कालावधीत ‘’घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने विशेष शोध मोहीम’’ राबविण्यात आली.
सदर मोहीमेमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील 139 डासअळीनाशक फवारणी कामगारांना त्यांच्या कामाचे विभागनिहाय नियोजन करून देण्यात आले होते व त्यांनी करावयाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीचा कृती आराखडाही देण्यात आला होता. प्रत्येक कामगारास प्रतिदिन 150 ते 200 घरांची तपासणी करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. या मोहीमेत त्यांनी संवेदनशील भागातील 72,182 घरांना भेटी देऊन तेथील संभाव्य 1,66,961 घरांतर्गत डास उत्पत्ती स्थानांची (वरची टाकी, खालची टाकी, लॅाफ्ट टॅंक, ड्रम, टायर्स कुंड्या इ.) तपासणी केली. त्यामध्ये 405 दूषित स्थाने आढळून आलेली असून, सदर दूषित डासउत्पत्ती स्थानांवर आवश्यक त्या ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यात आली व इतर डासोत्पत्ती स्थाने नागरिकांना आरोग्य शिक्षण देवून त्यांच्याकडून नष्ट करून घेण्यात आली. ही कार्यवाही मोहीमेनंतरही सुरूच आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिवताप, डेंग्यू यासारख्या आजाराच्या नियंत्रणाकरिता महानगरपालिकेसोबत तेथील नागरिक तसेच इतर सरकारी संस्था व खाजगी संस्थांचे सक्रिय सहकार्य मोलाचे व अपेक्षित असल्याने, सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी जागरुक राहून, त्यांच्या घरात व घराभोवतालच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच हिवताप, डेंग्यू आजाराचा रुग्ण किंवा इतर तापाचा रुग्ण आढळल्यास नजिकच्या नमुंमपा रुग्णालयात, नागरी आरोग्य केंद्रात तातडीने संपर्क साधावा आणि महानगरपालिकेमार्फत आपल्या घरी भेटी देणा-या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांस सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-10-2023 07:31:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update