*हवा गुणवत्ता राखण्याविषयी जागरूकतेबाबत बांधकाम विकासकांची कार्यशाळा *
वायूप्रदूषण ही बाब थेट आपल्या आरोग्याशी निगडीत असून ते कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सतर्कतेने प्रयत्न करीत असून वायूप्रदूषणाला प्रतिबंध करणारे उपाय राबविण्याप्रमाणेच हवेच्या गुणवत्ता वाढीवरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. यामध्ये बांधकाम विकासक हा महत्वाचा घटक असून बांधकाम करताना धूळीला प्रतिबंध व डेब्रिज व्यवस्थापन याबाबत काळजीपूर्वक कार्यवाही करणे गरजेचे आहे हे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी याविषयी नवी मुंबई महानगरपालिका प्रमाण कार्यप्रणाली (SOP) बनवित असल्याची माहिती दिली. याबाबतच्या कार्यवाहीकडे वायूप्रदूषणाशी संबंधित सर्वच घटकांनी जागरुकतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमांतर्गत इन्स्टिटयुट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज् यांच्या सहयोगाने आयोजित रियल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या क्षमतावृध्दी उपक्रमा प्रसंगी महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, आएससीचे संचालक श्री. विवेक अधिया, हवा गुणवत्ता व बांधकाम विषयातील तांत्रिक सल्लागार श्री. संदीप नारंग आदी मान्यवर उपस्थित होते.
धूळ प्रदूषणाला निर्मितीच्याच ठिकाणी प्रतिबंध करणे ही अत्यंत गरजेची गोष्ट असून त्यादृष्टीने महानगरपालिका प्रमाण कार्यप्रणाली जारी करीत आहे, त्याची अंमलबजावणी मात्र दंडाच्या भीतीमुळे नव्हे तर स्वयंस्फूर्तीने व्हायला हवी अशी अपेक्षा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
महानगरपालिकेने बांधकाम व पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा केला असून त्याची कार्यवाही पूर्ण क्षमतेने करण्याकडे अभियांत्रिकी विभागाने काटेकोर लक्ष दयावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
याप्रसंगी बोलताना शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविकपर मनोगतात अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांनी वायूप्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये महत्चाची भूमिका असलेल्या बांधकाम विकासकांकरीता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
आयएससीचे राष्ट्रीय संचालक श्री. विवेक अधिया यांनी आपल्या मनोगतात नवी मुंबई महानगरपालिका खूप वर्ष आधीपासूनच वायूप्रदूषण रोखण्यासाठी गंभीरतेने काम करीत असल्याबद्दल प्रशंसा करीत बांधकाम व्यावसायिकांप्रमाणेच समाजातील प्रत्येक जबाबदार घटकाने आपल्या परीने वायूप्रदूषण रोखण्यासाठी काम करावे असे आवाहन केले. या उपक्रमाप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम विकासक तसेच महानगरपालिकेचे अभियंते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
Published on : 28-04-2022 17:19:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update