*ऐरोलीतील बाबासाहेबांचे स्मारक हे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक काम - विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे*
स्मारकातील अत्याधुनिक ग्रंथालय, छायाचित्र संग्रहालय अशा विविध सुविधांतून बाबासाहेबांना ख-या अर्थाने समजून घेता येते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक म्हणजे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक काम असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या "जागर 2022" उपक्रमात 'भारतातील प्रबोधनाच्या चळवळी' या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान देताना ते बोलत होते.
विश्वाचा केंद्रबिंदू माणूस असून जगण्याला अर्थ देण्यासाठी माणूस जगत असतो. माणसाच्या उन्नतीसाठी काम केले जात असताना विज्ञानाच्या प्रगतीतून प्रबोधनाची चळवळ सुरु झाली. युरोपामध्ये 14 व्या शतकात रेनसाँ ही प्रबोधनाची चळवळ पहिल्यांदा सुरु झाली आणि पुढे विविध स्वरुपाच्या प्रबोधनात्मक चळवळी जगभरात उभ्या राहिल्या. समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रणी राहिला असे सांगत डॉ. रावसाहेब कसबे यांनी महाराष्ट्रासह भारतभरातील प्रबोधनाच्या चळवळींचा आढावा घेतला. प्रबोधनाच्या चळवळीने प्रश्न विचारायला शिकविले, त्यामुळे विकासाला गती मिळाली असे सांगत त्यांनी बाबासाहेबांचे सर्वात मोठे योगदान असलेल्या समतेचे तत्व प्रस्थापित करणा-या भारतीय राज्यघटनेला प्रबोधनाच्या चळवळीचा आधार असल्याचे मत व्यक्त केले.
माणूस का जगतो? या प्रश्नाने व्याख्यानाची सुरुवात करीत बुध्द तत्वज्ञानातील विविध उदाहरणे देत डॉ. रावसाहेब कसबे यांनी विवेचनात्मक ऊहापोह केला. वारकरी परंपरेने समाज प्रबोधनाचे फार मोठे काम केले असल्याचे सांगत त्यांनी तुकारामांच्या अनेक अभंगांचे दाखले दिले.
मानवजातीच्या समोरचे सर्व प्रश्न प्रेम आटल्यामुळे आहेत असे स्पष्ट करीत हे प्रेमच माणसाच्या माणूसपणाचे रक्षण करणारे सर्वात मोठे साधन असल्याचे कबीरांनी सांगितले. या सर्वस्पर्शी विचारांची प्रेरणा घेत बाबासाहेबांनी बुध्द, कबीर व महात्मा फुले यांना गुरु मानले असे ते म्हणाले. दक्षिणेमध्ये प्रबोधनाच्या चळवळी मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिणेकडील राज्येही पुरोगामी विचारांची राहिली असे स्पष्ट करीत डॉ. रावसाहेब कसबे यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच दक्षिणेकड़ील रामास्वामी पेरियार यांच्या समाज सुधारणा विषयक कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मारक व्हावे या भूमिकेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आगळ्यावेगळ्या पध्दतीने जयंती साजरी व्हावी यादृष्टीने "जागर 2022" या विशेष उपक्रमाचे 30 मार्चपासून आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत झालेल्या मान्यवरांच्या व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद लाभला असून 6 एप्रिल 2022 रोजी दैनिक लोकसत्ताचे संपादक तथा नामांकित विचारवंत, साहित्यिक श्री. गिरीश कुबेर हे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अर्थतज्ज्ञ" या विषयावर तसेच 7 एप्रिल 2022 रोजी सुप्रसिध्द लेखक श्री. अरविंद जगताप 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तरी वि्चारांचा जागर करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 06-04-2022 11:34:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update